Complete Guide to Akshaya Tritiya 2025 | अक्षय्य तृतीया

Complete Guide to Akshaya Tritiya 2025 | अक्षय्य तृतीया

Akshaya Tritiya

अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya) हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya) साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त समजला जातो. काल- विवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशेष आहे. या दिवसाला आखा तीज असेही म्हटले जाते.

ह्या दिवशी अन्नपूर्णा (देवी) जयंती, नर-नारायण या जोडदेवाची जयंती, परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती आणि
हयग्रीव जयंती असते. या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांचे लेखनिक म्हणून गणपतीने काम केले अशी अख्यायिका प्रचलित आहे.

अक्षय्य तृतीयेचे महत्त्व.

या तिथीला केलेला जप, होम, पितृतर्पण, दान इत्यादी केलेले कोणतेही पुण्य कर्म अक्षय्य होते. म्हणजे त्याचा नाश होत नाही. म्हणून या तिथीला अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya) असे म्हणतात. कृतयुगाचा हा प्रारंभ दिन. कोणत्याही शुभ कार्याला हा दिवस उत्तम समजला जातो. म्हणून या दिवशी नवीन जागा, संस्था, नवीन व्यापार यांची सुरुवात करतात.

या दिवशी सोमवार किंवा बुधवार आणि रोहिणी नक्षत्र असेल तर तो अतिशय श्रेष्ठ योग समजला जातो. प्रातःकाळी पवित्र तीर्थ- स्नान करून दानधर्म करावा. भगवान विष्णूंच्या प्रित्यर्थ हा सण रूढ झाला आहे. म्हणून या दिवशी भगवान विष्णूंची यथा- सांग पूजा करावी.

साधूची कथा.

अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya) संबंधी एक प्राचीन कथा आहे. एका गावात एक व्यापारी राहत होता. तो नेहमी दानधर्म करीत असे. देवपूजा करीत असे. मंदिरात देव दर्शनाला जात असे. व तेथे साधू संतांच्या कथा मोठ्या भक्ती भावाने ऐकत असे. काही दिवसांनी त्या व्यापा-याची सगळी संपत्ती संपली. त्याला दारिद्र्य आले. एके दिवशी तो किर्तनाला गेला असता तेथे त्याने ऐकले की बुधवारी रोहिणी नक्षत्रासह तृतीया आल्यास त्या दिवशी केलेले पुण्य अक्षय्य राहते.

एक दिवस तसा योग आला. वैशाखातील ती तृतीया होती. वार बुधवार होता व रोहिणी नक्षत्र होते. व्यापाऱ्याला अतिशय आनंद झाला. त्याच्याजवळ कष्ट करून साठवलेले काही पैसे होते. त्या व्यापाऱ्याने अतिशय भक्ती- भावाने त्यादिवशी दानधर्म केला.

काही दिवसांनी तो व्यापारी मरण पावला. पुढच्या जन्मी तो कुशावती नगरीचा राजा झाला. त्याने मोठे यज्ञ केले. दानधर्म केला. त्याला सर्व सुखे मिळाली. तरीसुद्धा त्याने पूर्वजन्मी केलेल्या पुण्याचा क्षय म्हणजेच नाश झाला नाही. ते अक्षय्य राहिले. हीच अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya).

परशुराम जयंती.

भगवान श्री परशुराम फार मोठे पराक्रमी होते. त्यांनी 21 वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली. त्यांचा जन्म याच तिथीला अक्षय्य तृतीयेला झाला. म्हणून या दिवशी सर्वत्र श्री परशुरामाची जयंती साजरी केली जाते.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहराजवळच्या महेंद्रगिरी नावाच्या पर्वतावर भगवान श्री परशुरामाचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी हा जन्मोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात कथा कीर्तन चालते. जागरणाचा कार्यक्रम असतो. या निमित्ताने अन्नदानही केले जाते.

ॠषभ देवाची कथा.

फार वर्षांपूर्वी ऋषभ देवाने याच तिथीला हस्तिनापूरचा राजा श्रेवांस याच्या घरी उसाचा रस प्राशन केला. त्यामुळे राजाच्या भोजनगृहातील अन्न कधीच संपले नाही. ते अक्षय्य राहिले म्हणून या तिथीला अक्षय्य तृतीया असे म्हणतात.

दानधर्म.

वैशाख महिन्यात अत्यंत कडक उन्हाळा असतो. अशावेळी तहानलेल्यांना पिण्यासाठी थंडगार पाणी देणे हे पुण्य कर्म समजले जाते. म्हणून अक्षय्य तृतीयेच्या दिवशी उदक- कुंभ दान देण्याची पद्धत आहे.यामुळे पितर तृप्त होतात व ते आपल्याला आशीर्वाद देतात. म्हणून त्या दिवशी उदक कुंभदान करावे.

अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेक लोक ज्ञानी लोकांना, शास्त्री-पंडितांना घरी बोलावून उत्तम भोजन देतात. दानधर्म करतात.
अक्षय्य तृतीयेला वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त समजण्याची रीत आहे. या दिवशी आपणास जे शक्य आहे असे एखादे पुण्य कर्म करावे असे पूर्वज सांगतात.

समाजातील गोरगरीब, पददलित, उपेक्षित यांना मदत करण्याची प्रेरणा देणारा त्यासाठी प्रवृत्त करणारा हा सण आहे. त्यामुळे समता निर्माण होऊन बंधुभाव आणि ऐक्य टिकण्यास मदत होते.

गुजरात मध्ये या दिवसाला ‘आखातरी’ असे म्हणतात. महाराष्ट्रात ग्रामीण भागात ‘अखिती’ या नावाने हा अक्षय तृतीया सण ओळखला जातो.

Other Articles-

Best Ram Navami Information in Marathi

गुढीपाडवा माहिती मराठी

1 thought on “Complete Guide to Akshaya Tritiya 2025 | अक्षय्य तृतीया”

Leave a Comment