Inspirational (Ahilyabai Holkar) अहिल्याबाई होळकर: एक आदर्श राणीची प्रेरणादायी कहाणी

Ahilyabai Holkar

(Ahilyabai Holkar)अहिल्याबाई होळकर – एक आदर्श राणी.

कर्तुत्वाचा, चारित्र्याचा आणि नेतृत्वाचा आदर्श ज्या श्रेष्ठ महिले कडून घ्यावा ती श्रेष्ठ महिला म्हणजे आहिल्याबाई होळकर होय.

(Ahilyabai Holkar)अहिल्याबाई होळकर बालपण.

औरंगाबाद जिल्ह्यातील बीड तालुक्यात सिना नदीच्या तीरावर चौंडी येथे ‘ माणकोजी शिंदे ‘ राहत होते. ते गावचे पाटील होते.

इ.स.१७२५ मध्ये त्यांना एक मुलगी झाली. तिचे अहिल्या हे नाव. पुढे त्याच अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) म्हणून नावारूपाला आल्या. माणकोजी धनगर होते. गावची पाटीलकी त्यांच्याकडे असल्यामुळे एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून त्यांचा नाव लौकिक होता. माणकोजी धर्मनिष्ठ व ईश्वर भक्त होते.

हेच संस्कार अहिल्याबाईं- वर सहज घडले होते. त्यांचा विवाह सुभेदार मल्हारराव होळकर यांचा मुलगा खंडेराव यांच्याशी इ.स.१७३३ मध्ये झाला. त्यावेळी अहिल्याबाईंचे वय आठ वर्षाचे होते. त्याचवेळी त्यांचे पती खंडोजी यांचे वय 10 वर्षाचे होते. अहिल्याबाईंची सासू गौतमीबाई व सासरे मल्हारराव हे त्यांच्याशी अत्यंत ममतेने वागत असत.

अहिल्याबाईंचे सासर होळकर घराणे. या घराण्यानेच त्यांना नावारूपाला आणले. त्यांच्या बाणेदारपणा, शौर्य, दानशूरता, सात्विकता या गुणांना झळाळी आली ती होळकर घराण्यातच.

(Ahilyabai Holkar) होळकर घराणे.

मल्हारीचा मामा भोजराज याने मल्हारीस पथकात एक आसामी दिली. येथे मल्हारीने आपले गुण दाखवले. मल्हारीची पहिली विशेष महत्त्वाची कामगिरी म्हणजे खानदेशात ‘अणकाई’ नावाचा एक किल्ला आहे. तेथे त्याने विजय संपादन केला. निजाम उल्मुल्काशी मराठ्यांचा सामना झाला. त्यात मल्हारीने निजामाच्या एका पुढाऱ्याला कंठस्नान घातले.

‘ बाड्यांच्या ‘ फौजेची तापी नदीकाठी भांडणे झाली. ती मल्हारीने शौर्याने मिटविली. त्याचा पराक्रम पाहून श्रीमंत पेशव्यांनी त्याला आपल्या फौजेसाठी कदम बांडे यांच्याकडे मागणी केली. मल्हारी पेशव्यांच्या सैन्यात दाखल झाला. श्रीमंत बाजीरावांनी मल्हारीस ५०० स्वरांची मनसब दिली व इ.स.१७८५ जून मध्ये मल्हारी सरंजामी सरदार झाला.

श्रीमंतांनी दिल्लीवर स्वारी केली. मोगलांचा पराभव केला. मोगलांनी हैदराबादचा वृद्ध निजाम याचे सहाय्य घेतले. या निजामा- पुढे मराठ्यांचे काही चालत नसे. निजाम बादशाहाच्या -वतीने हैदराबादहून लढण्यासाठी आला. मल्हारी च्या मदतीने भोपाळमध्ये निजामाचा पराभव केला गेला.

मल्हारी इ.स.१७२८ मध्ये उत्तरेस खानदेशात बारा परगणे मिळाले होते. चार वर्षात ती संख्या 84 पर्यंत गेली. यावरून त्याच्या कर्तुत्वाची कल्पना येते.

मल्हारजींच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा व आनंदाचा दिवस म्हणजे इ.स.१७२३ त्यांना पुत्ररत्न झाले. खंडोबा हे होळकरांचे आराध्य दैवत असल्यामुळे आपल्या पुत्राचे नाव खंडेराव असे ठेवले.

खंडेराव लहानपणापासून वडिलांबरोबर लढाईत जात असे. त्याकाळी युद्ध कला हेच मुख्य शिक्षण असे. ते खंडेरावाला चांगल्या प्रकारे प्राप्त झाले होते. परंतु त्याला चांगली संगत लाभली नसल्यामुळे तो व्यसनी झाला. अशा या खंडेरावाशीच अहिल्यादेवींचे लग्न झाले. मल्हारजीस दोन कन्या होत्या.

एकीचे नाव उदाबाई व दुसरीचे सोनाबाई. उदाबाई ही अहिल्याबाईंशी अत्यंत चांगली वागत असे. तिचा उपयोग अहिल्याबाईंना राज्य- कारभार करताना झाला.

अहिल्याबाई व खंडेराव.

अहिल्याबाईंचा विवाह मल्हारराव होळकरांच्या मुलाशी वयाच्या आठव्या वर्षी झाला. सासू गौतमीबाई व सासरे मल्हारराव यांचे प्रेम अहिल्याबाईंना मिळाले. त्यांच्या छत्राखालीच त्यांचे बालपण केव्हा संपले हे समजलेच नाही.

मल्हारराव व गौतमीबाई हे दोघेही अतिशय प्रेमळपणे अहिल्याबाईंशी वागत असत. मुलाचे वर्तन त्यांना आवडत नसे. सुनेचे वर्तन सात्विक असल्यामुळे तिच्या तेजस्वीतेमुळे त्यांचा सुनेकडे अधिक ओढा लागला.

आपली सून सद्गुणी, हुशार कुशाग्र बुद्धीची, धर्मपरायण आहे, याची जाणीव दोघांनाही होती. त्यामुळे सासू-सासर्‍यांचे प्रेम अहिल्याबाईंना लाभले. अहिल्याबाईही वृद्ध सासू-सासर्‍यांची सेवा मनापासून करत असत.

आपली सून प्रत्येक कामात दक्ष आहे हे पाहून मल्हारजींनी अहिल्याबाईंवर पुत्रवत प्रेम केले. सुभेदार आपल्याबरोबर अहिल्याबाईंना युद्धास घेऊन जात असे. यात्रेसही त्या सासऱ्यांबरोबर असत. प्रवासामुळे व मल्हार रावांच्या सहवासामुळे त्या सर्व गोष्टीत तरबेज झाल्या.

भौगोलिक ज्ञानही त्यांना बरेचसे प्राप्त झाले. वैविध्याचीही कल्पना त्यांना त्यामुळेच झाली.अहिल्याबाईंना देपाळपुरात इ.स.१७४५ साली पुत्ररत्न झाले, त्याचे नाव मालेराव असे ठेवले. त्यानंतर तीन वर्षांनी त्यांना कन्यारत्न झाले, तिचे नाव मुक्ताबाई असे ठेवले.

इ.स.१७५४ साली डीगेजवळ कुंभेरीच्या किल्ल्यास मराठ्यांच्या सैन्याने वेढा दिला. यावेळेस अहिल्याबाई मल्हारजींस मदत करत होत्या. खंडेरावाचे व्यसन याच काळात जास्त झाले होते. प्रत्यक्ष रणांगणात असताना तो व्यसनात दंग होता. भोजन करून मोर्चाच्या निशाणापाशी खंडेराव आला असताना अकस्मात गोळी लागून खंडेराव गतप्राण झाला. अहिल्याबाईंवर आभाळ कोसळले.

मल्हारजी पुत्रशोकात बुडून गेले. त्याकाळी सती जाण्याची पद्धत होती. खंडेरावांच्या बरोबर सती जाण्याचे अहिल्याबाईंनी ठरवले.सती जाण्याची त्यांनी तयारी केली. हा प्रकार पाहून मल्हारराव अधिकच खचले. त्यांची सारी भिस्त अहिल्याबाईंवर होती. मालेराव फारच लहान होता व मल्हार जी वृद्ध झाले होते. सती जाणाऱ्या अहिल्येस ते म्हणाले तुला राज्य व सारी दौलत सांभाळायची आहे. तूच माझा खंडू आहेस. तेव्हा सती जाण्याचा पुनर्विचार करावा.

आपल्या सासऱ्यांचे म्हणणे ऐकून अहिल्याबाईंनी सती जाण्याचा मनोदय रद्द केला. होळकर घराण्याला सावरायचे काम व राज्यकारभार करण्याचे काम अहिल्याबाईंनी केले.

मल्हारजी अहिल्याबाई राज्यकारभार शिकवत असे. त्यांची कामकाजात मदत घेत असे पण खंडेराव गेल्यानंतर त्यांनी अहिल्याबाईंच्या नावाने पत्रव्यवहार, कागदपत्रे करण्यास सुरुवात केली. त्या संस्थांचे कामकाज पाहू लागल्या.

त्यांचा परिचय सर्वांना झाला. पुणे दरबारातही कीर्ती जाऊन पोहोचली. अशा तऱ्हेने आपले दुःख विसरून खंबीरपणे राज्यकारभार करण्यास अहिल्याबाई उभ्या ठाकल्या.

(Ahilyabai Holkar) अहिल्याबाईंचा राज्यकारभार.

धर्मशास्त्रदृष्ट्या अहिल्याबाईंना गादीवर बसता येत नव्हते. म्हणून विश्वासू व आपल्याच घराण्यातील तुकोजी होळकरांना गादीवर बसवले. राज्यकारभारात कागदोपत्री तुकोजीचे नाव आले. अहिल्याबाई स्वतःला मासाहेब, महाराणी अशी विशेषणे लावत नसत, तर दरबार, महाराज वगैरे पुरुषार्थी शब्द वापरत असत.

साऱ्या कारभाराची भिस्त अहिल्यादेवी समर्थपणे सांभाळत असत. राज्य कसे चालवावे हे शिवरायांनंतर अहिल्यादेवी कडून आपल्याला शिकायला मिळते. राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतल्याबरोबर संस्थानचा सर्व कारभार तुकोजीच्या हाती दिला. त्या स्वतः कधी लढाईवर गेल्या नाहीत.

परंतु तुकोजीला मार्गदर्शन करण्याचे काम त्या करीत असत. तुकोजी होळकर सतत बारा वर्षे दक्षिणेत होता. त्यावेळी संस्थानाविषयी येणाऱ्या अडचणी, तो अहिल्याबाईंना कळवीत. तेव्हा त्या त्यास मार्गदर्शन करीत. युद्धविषयक गोष्टी, जबाबदारीने सांभाळत असत.

अहिल्याबाईंची राज्याची अंतर्गत व्यवस्था.

नाना फडणवीस, मल्हारजी, हरिपंत इत्यादी त्या काळातील प्रतिष्ठित मंडळींच्या मतांचाही अहिल्यादेवी विचार करीत असत. त्या आपल्या प्रजेकडून उत्पन्नाचा चौथा हिस्सा घेत असत. पाटील, पटवारी, जमीनदार यांचे हक्क त्या धार्मिक कृत्यातील एक भाग समजत असत.

लोकांच्या कामकाजाकडे लक्ष देणे हीच त्यांच्या आदर्श राज्यव्यवस्थेची गुरुकिल्ली होती.
त्यांनी मराठ्यांसारखे आपल्या खंडणी दारास कधीही छळले नाही. उलट त्यांची चांगली भरभराट व्हावी हा हेतू मनात ठेवला. त्यांच्या प्रगतीमुळेच आपली प्रगती होणार आहे, आपल्याला स्थिरता लाभणार आहे हे त्या जाणून होत्या.

हा मनाचा मोठेपणा त्यांच्या सात्विक आचरणामुळे होता. त्यांच्या धर्ममय आचरणामुळे त्यांच्याशी खंडणीदार चांगले वागत असत. त्यांचे राज्य प्रजेच्या प्रेमावर चालले होते.

लहान संस्थानास वेळ पडली तर पैशाचीही मदत अहिल्याबाई करत असत. चांगल्या अधिकाऱ्याकडून त्यांच्या संस्थानाची उत्तम व्यवस्था करून देत असत. अहिल्याबाई स्वतः गनिमी काव्याने लढण्यात पटाईत होत्या. मल्हारजींबरोबर अनेक वेळा लढाईला गेल्यामुळे युद्धाचे ज्ञान त्यांना परिपूर्ण होते.

अहिल्याबाईंनी प्रजेचा पैसा स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी कधीही वापरला नाही व इतरांकडूनही तो वाटेल तसा मिळवण्याचा प्रयत्न केला नाही.

संपत्तीची हाव नसल्यामुळे प्रजेला लुबाडून सरकारी खजिना ही कधी वाढवला नाही.

(Ahilyabai Holkar) अहिल्याबाईंची न्याय व राज्यव्यवस्था.

अहिल्याबाई न्यायी होत्या. अहिल्याबाईंच्या न्यायव्यवस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे संस्थानातील कोणत्याही व्यक्तीस तक्रार मांडता येत असे. प्रत्येकाची तक्रार त्या लक्ष देऊन ऐकत असत व त्यावर निर्भीडपणे न्याय देण्याचे काम त्या स्वतः करत असत.

नानासाहेब पेशवे यांना एक दोनदा व्यापाऱ्यांची शंका येऊन त्यांच्या जमाखर्चाच्या वह्या भर दरबारात तपासल्या. त्यावेळी आपल्या प्रतिष्ठेला धक्का लागेल म्हणून व्यापारी अहिल्याबाईंकडे गेले. अहिल्याबाईंनी त्यांची बाजू ऐकून घेतली. त्यांनी नानांची समजूत घातली त्या म्हणाल्या ” अशाप्रकारे व्यापाऱ्यांची पत नाहीशी झाली तर व्यापार मंडळीस धक्का बसेल. ” शेवटी नानांनी माघार घेतली.

अहिल्याबाईंकडे न्याय मिळविण्यासाठी आलेली कोणतीही व्यक्ती कोणत्याही जाती धर्माची असो, शत्रू असो पण सर्वांना न्याय फुकट मिळत असे. राजाचे प्रजापालन हे धार्मिक कर्तव्य समजले जात असे. अहिल्याबाईंनी दौलतीचा जो पैसा होता, त्याचा दुरुपयोग कधीही केला नाही. सर्व पैसा प्रजेच्या रक्षणासाठी वापरला. हिंदुस्थानातील सार्वजनिक कामासाठी त्यांनी पैसा वापरला.

एवढी सत्ता कर्तुत्व हातात असूनही त्यांनी राजेपणाचा अहंकार कधी केला नाही. आपण प्रजेतील एक आहोत असेच त्या मानत असत.

(Ahilyabai Holkar) अहिल्याबाई लढाया व बंदोबस्त.

मल्हाररावानंतर अहिल्याबाई राज्य चालवू लागल्या. मल्हाररावांचा सगळीकडे दबदबा असल्यामुळे चंद्रावर, उदेपूर ही मंडळी गप्प होती. मल्हाररावांच्या मृत्यूनंतर पाच-सहा वर्षे चंद्रावत शांत होते. पण अहिल्याबाई स्त्री आहे व मागील राग जागृत होऊन त्यांनी होळकरांविरुद्ध रामपुऱ्यात बंड उभारले, उदेपूरच्या गादीवर त्यावेळी राणा अरिसिंह होता.

त्याने चंद्रावताला मदत केली. आपले काही सैन्य पाठवले. स्वतःही चितोर पर्यंत आला. ही लढाई इ.स.१७७१ जानेवारी ते मार्च पर्यंत चालली होती. तुकोजी होळकर पेशव्यांच्या बरोबर उत्तर हिंदुस्थानातील लढाईत गुंतला होता. त्यामुळे रामपु-यातील बंडात तो सामील होऊ शकला नाही.

अशा प्रसंगी लढाईची पूर्ण जबाबदारी अहिल्यादेवींवर पडली. पुरेसे सैन्य हाताशी नसतानाही त्या लढाईसाठी उभ्या ठाकल्या. लोकांची जमवाजमव करून सैन्याची उभारणी केली. पराक्रमी शरीफभाई यांच्या हाती सैन्य दिले व चंद्रावतावर पाठविले. घनघोर लढाई झाली व चंद्रावतांना आपला पराभव मान्य करावा लागला. राणाने तहाची बोलणी करण्याचे मान्य केले.

१७८७ मध्ये परत याच युद्धाचा भडका उडाला. रजपूत लोकांनी महादजी शिंदे यांचा पराभव केला. शिंदेयांना पळता भुई थोडी झाली. त्यानंतर रजपूत होळकरांकडे वळले. त्यांनी होळकरांचा निंबाहेडा महाल खालसा केला.

अहिल्याबाई (Ahilyabai Holkar) या बंडाविरुद्ध उभ्या ठाकल्या. त्यांनी आबाजी पंत, राघो- रणसोड्यांच्या बरोबर आपले सैन्य युद्धासाठी पाठवले. या युद्धात आबाजी पंत मारले गेले. होळकरांच्या फौजेत गोंधळ माजला.

अहिल्याबाईंना हे समजताच त्यांनी शरीफभाई यांना मानाची वस्त्रे देऊन, सैन्य देऊन युद्धास पाठवले.१७८८ मध्ये मोठी लढाई झाली. त्यात अहिल्याबाईंचा विजय झाला.
या लढाईमुळे अहिल्याबाईंची कीर्ती सगळीकडे पसरली. पुणे दरबारात त्यांच्या शौर्याचे, धोरणांचे कौतुक झाले.

भिल्ल, गोंड व रामोशी यांचा बंदोबस्त.

अहिल्याबाईंच्या राज्यात त्या काळात भिल्ल, गोंड व रामोशी या लोकांनी धुमाकूळ घातला होता. त्यामुळे प्रजेला अतिशय त्रास होत असे. हे लोक लूटमार करण्याचा पिढीजात धंदा राजरोसपणे, उघडपणे करीत असत. चोरी करणे, लुटणे यामध्ये आपण काही वाईट करत आहोत असे त्यांना वाटत नसे.

या लोकांना वाठणीवर आणावे व दुष्कृत्यांपासून त्यांना परावृत्त करण्याचे काम राणी या नात्याने अहिल्याबाईंचे होते. प्रथम त्यांनी चांगल्या मार्गाने त्यांना सांगण्याचा, समजावण्याचा प्रयत्न केला. पण उपयोग झाला नाही. अशा लोकांनी संस्थानावरच दरोडा घातला. सरळ मार्गांनी काम होत नाही असे पाहून त्यांनी मनरूप- सिंग या पुढार्‍यास व त्याच्या सहकाऱ्यांस पकडले व सर्वांवर वचक बसावा म्हणून तोफेच्या तोंडी दिले.

दानशूर अहिल्याबाई (Ahilyabai Holkar).

अहिल्याबाईंची कीर्ती सगळीकडे पसरली ती त्यांच्या दानशूरतेमुळे व धार्मिक वृत्तीमुळे. लोकांच्या सोयीसाठी त्यांनी अन्नछत्रे उभारली, जागोजागी धर्मशाळा बांधल्या, तलाव, विहिरी, रस्ते बांधले. रस्त्यांमुळे दळणवळणाचे मार्ग सुखकर झाले.
काशीविश्वेश्वराच्या व गयेतील विष्णूपदाच्या मंदिराचा जिर्णोद्धार केला. कलकत्त्यापासून काशीपर्यंत महामार्ग तयार केला. अन्नछत्रे, देवळे, धर्मशाळा या कायमस्वरूपी चालाव्यात म्हणून त्यांनी खर्चाची सोय तेथेच घरे बांधून केली. घराच्या किंवा जमिनीच्या भाड्यातून तो खर्च केला जाईल अशी व्यवस्था केली.

प्रजाहित हा धार्मिक कृत्याचा एक भाग आहे असे अहिल्याबाई समजत. अनेक उद्योगधंद्यांना राजाश्रय होता.
इंदुरी व महेश्वरी साड्या विणणाऱ्या विणकारांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे उद्योग अहिल्याबाईंनी भरभराटीस आणले होते. युद्धासाठी लागणाऱ्या दारूगोळ्याचे कारखाने त्यांच्या राज्यात होते. युद्धविषयक सल्ले, तह, परराज्यातील संबंध या गोष्टी त्या स्वतः बघत असत.

एकदा राघोबा दादा पेशवे यांनी अहिल्याबाई होळकर यांच्यावर चालून जाण्याचा बेत आखला होता. त्याचवेळी अहिल्याबाईंचे बाणेदारपणाचे उत्तर असे होते की ” थोडा दूरदृष्टीने विचार करा. हलक्या लोकांच्या नादी लागून आमच्याशी वैर धरू नका. परिणाम वाईट होतील.

बाई बरोबर लढण्यात कसली आली आहे बहादुरी? या लढाईत मी हरले तर लोक म्हणतील बाईचं आहे, पण तुम्ही जर पराभूत झाला तर तुमची छी : थू होईल.” हे उत्तर ऐकून राघोबांचे हृदय परिवर्तन झाले.

अहिल्याबाईंनी रामपुरा येथे चंद्रवंतांनी उठाव केला तेव्हा, स्वतःच्या मार्गदर्शनाखाली सैन्य उभे केले व चंद्रवंताचा पराभव केला. या विजयाचे पेशव्यांनी व नाना फडणवीसांनी कौतुक केले.

अहिल्याबाई एक उत्तम प्रशासक होत्या. त्यांनी पुणे ते महेश्वर अशी टपालसेवाही सुरू केली होती. कट्टर कर्मयोग्याप्रमाणे त्या आपले जीवन जगल्या. भल्या- भल्यांना लाभली नाही, अशी दूरदृष्टी त्यांना लाभली. अशा या गंगाजळनिर्मळ राणीला लोक मातोश्री म्हणून संबोधत असत.

मल्हारराव होळकरांची ही सून बाणेदार, स्वाभिमानी, उत्तम राज्यकर्ते होती. त्या काळातील त्यांचे विचार आजही मार्गदर्शक ठरतात. १३ ऑगस्ट १७९५ ला अहिल्याबाई अनंतात विलीन झाल्या.

अहिल्याबाईंचे स्मारक त्यांनी बांधलेल्या अनेक विहिरी, धर्मशाळा, पूल, रस्ते, घाट व देवळे यांच्या स्वरूपात झालेले दिसते. सौराष्ट्रात सोमनाथांचे, गयेला विष्णूंचे आणि काशीला विश्वेश्वराचे अशी नामांकित देवालय त्यांच्या धार्मिक वृत्तीची व दातृत्वाची आजही साक्ष देतात.

Other Articles –

Rabindranath Tagore (रवींद्रनाथ टागोर)

Dr Babasaheb Ambedkar

Follow Us on YouTube – Marathi Antarang

Leave a Comment