भारतात जे महान पुरुष होऊन गेले, त्यात जागतिक कीर्तीचे महाकवी, तत्त्वज्ञ, साहित्यिक आणि नवीन शिक्षण पद्धतीचे प्रवर्तक म्हणून रवींद्रनाथ टागोरांचे (Rabindranath Tagore) नाव घ्यावे लागते. त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले, ज्यामुळे ते जगातील पहिले गैर युरोपिय आणि साहित्यातील पहिले गीतकार बनले.

जन्म व शिक्षण.
रवींद्रनाथ टागोर(Rabindranath Tagore) यांचा जन्म ७ मे १८६१ रोजी बंगालमधील जोजासांको या ठिकाणी अत्यंत समृद्ध घराण्यात झाला. त्यांच्या आईचे नाव शारदा देवी आणि वडिलांचे नाव देवेंद्रनाथ हे होते. त्यांना आठ भाऊ व सहा बहिणी होत्या.
त्या काळात घरी मुलांनी शिकावे ही पद्धत रुढ होती. रवींद्रनाथांना इंग्रजी, चित्रकला, व्यायाम शिकविण्यासाठी शिक्षक घरी येत असत. त्यांचे पारंपरिक शिक्षण इंग्लंडमधील पूर्व ससेक्समधील ब्राइटन येथे एका सार्वजनिक शाळेत सुरू झाले. टागोर १८७८ मध्ये बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेले.
कायद्याचे शिक्षण त्यांना आवडले नाही. लंडन मधील युनिव्हर्सिटी कॉलेज सोडून देऊन ते भारतात आले. तत्पूर्वी इंग्लंड मध्ये असताना त्यांनी शेक्सपियर, इंग्रजी, आयरिश आणि स्कॉटिश साहित्याचा अभ्यास केला. इंग्लंड मधून परतल्यानंतर त्यांनी १८८३ साली मृणालिनी देवीशी विवाह केला. मृणालिनी फारशा शिकलेल्या नव्हत्या. त्यांना लग्नानंतर रवींद्रनाथांनी संस्कृत आणि इंग्रजी शिकविले.
बालवयापासून कविता.
अगदी लहानपणातच रवींद्रनाथांना शब्दांचा अर्थ त्यातील नादमाधुर्य समजू लागले होते. लहानपणापासून त्यांची प्रतिभा ही विकसित होऊ लागली होती. त्यामुळेच ते लहानपणीच कविता करू लागले होते.
रवींद्रनाथ कविता करतात, हे त्यांचे वडील देवेंद्रनाथ आणि त्यांच्या शिक्षकांच्या कानावर गेले होते. रवींद्रनाथांच्या कविता वाचून त्यांनी आनंदाने रवींद्रनाथांचे कौतुकही केले व त्यांना शाबासकीही दिली होती.
शांतीनिकेतन.
शांतीनिकेतनचे अद्भुत आणि सुंदर वातावरण रवींद्रनाथांना खूप आवडले. तेथील निसर्गरम्य वातावरण त्यांना खूप आवडले. मुळात निसर्ग त्यांना खूप प्रिय होता. त्या निसर्गरम्य वातावरणामुळे त्यांच्या चित्तवृत्ती बहरून येऊ लागल्या. त्यांना तेथे कविता लिहिण्याची स्फूर्ती मिळाली. हळूहळू त्यांच्या कविता प्रसिद्ध होऊ लागल्या. त्यांच्यातील कवी जागृत होऊ लागला.
टोपण नावाने कविता.
रवींद्रनाथांच्या कविता भानुसिंग या टोपण नावाने प्रसिद्ध होऊ लागल्या. लोक भानुसिंहाच्या कविता म्हणून रवींद्रनाथांच्या कविता अनुभवत होते. लोक त्यांच्या कवितांनी आश्चर्यचकित होत असत. रवींद्रनाथांना कविता करण्यासाठी घरातून आणि बाहेरून प्रोत्साहन मिळू लागले होते. त्यांच्या प्रतिभाशक्तीला जणू खतपाणीच मिळत होते.
अनेक विषयांचे वाचन केल्यामुळे रवींद्रनाथांची बुद्धी प्रगल्भ झाली होती. जीवन मरणाच्या या चक्रात मृत्यू सुद्धा त्यांना जवळचा मित्र वाटू लागला होता. जीवनात विविध अनुभव घेतल्यावर रवींद्रनाथांना एकांत- वास प्रिय वाटू लागला. हा एकांत वास शोधण्यासाठी त्यांनी खूप भ्रमंती केली. अनेक ठिकाणांना त्यांनी भेटी दिल्या. त्यांनी निसर्गाचे विलोभनीय रूप व रंग पाहिले. त्यामुळेच आपले काव्य विलोभनीय छटांत आणि रंगात फुलविले होते.
रवींद्रनाथ शहर सोडून खेड्यात आले होते. खेड्यातील नैसर्गिक वातावरण, येथील भोळे लोक, त्यांची राहणी, त्यांच्या प्रेमळ भावना त्यांची विचार करण्याची पद्धत. या ग्रामीण जीवनाकडे त्यांनी सूक्ष्म दृष्टीने पाहिले. यामुळेच त्यांच्या लिखाणात खेडूत /ग्रामीण जीवनाचे नेमके आणि स्पष्ट चित्र उमटलेले दिसते. यामुळेच त्यांच्या कथाकथनाला एक झळाळी आणि प्रतिष्ठा लाभली. म्हणून रवींद्रनाथांना बंगाली कथेचे जनक अशी सार्थ कीर्ती प्राप्त झाली.
विश्वभारती विद्यापीठ.
रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन मध्ये विश्वभारती विद्यापीठाची स्थापना केली. साहित्य, कला आणि संशोधन याबाबतचा अभ्यास उच्च दर्जाचा असावा, असे त्यांना वाटे. म्हणून त्यांनी विश्वभारतीमध्ये तशीच सुविधा निर्माण केली होती.
शांतिनिकेतन मधील शैक्षणिक सुविधांची, तेथील उच्च प्रतीच्या शिक्षणाची माहिती सर्वांना व्हावी, म्हणून त्यांनी
‘ शांती निकेतन ‘ हे छोटेखानी नियतकालिक सुरू केले. हळूहळू विश्वभारतीचे रूप विशाल झाले. चिरंतन सत्याच्या शोधासाठी माणसाच्या आत्म्याचा अभ्यास करणे, हे विश्वभारतीचे उद्दिष्ट ठरले.
जीवन घडविणाऱ्या सर्व कलांना, उपक्रमांना, कार्यक्रमांना आपल्या शिक्षण संस्थेत स्थान असावे असे त्यांना वाटत असे. त्याप्रमाणे त्यांनी असे विविध उपक्रम सुरू केले होते.
प्रयोगांतीच माणसाला ज्ञानाचे नवे दालन खुले होते. म्हणून रवींद्रनाथांनी शैक्षणिक क्षेत्रात खूप प्रयोग केले. त्यांनी लिहिलेल्या
‘गीतांजली’ या बंगाली भाषेतील काव्याला जागतिक प्रतिष्ठेचे, मानाचे समजले जाणारे नोबेल पारितोषिक मिळाले. रवींद्रनाथांवर अभिनंदनचा वर्षाव झाला. असा सन्मान मिळविणारे युरोपबाहेरील ते पहिलेच साहित्यिक होते. कलकत्ता विद्यापीठाने त्यांना डी.लिट. ही पदवी बहाल करून त्यांचा गौरव केला. गीतांजली हे त्यांचे काव्य म्हणजे सौंदर्यदृष्टीचा उत्कृष्ट नमुना होय.
रवींद्रनाथांचे साहित्य.
रवींद्रनाथांनी काव्य आणि कथा यांच्याबरोबर नाटके आणि कादंब-याही लिहिल्या होत्या.
नौकाडुची, चतुरंग या कादंबऱ्या आणि मूकधारा, निसर्गाचा सूड अशी नाटके ही त्यांनी लिहिली. पोस्ट ऑफिस हे त्यांचे नाटक खूप गाजले. तशाच त्यांच्या अनेक कादंबऱ्याही गाजल्या.
कादंबरी.
गोरा (१९१०), घरे बाईरे (१९१६), चतुरंग १९१६), जोगाजोग( १९३०) मुक्त धारा
(१९१६), राज ऋषी (१९१६),
राजा और राणी (१९१६) या कादंबऱ्या.
लघुकथा.
काबुलीवाला, दृष्टिदान, क्षुधित पाषाण.
नृत्य नाटिका.
चंडालिका१९३८, चित्रांगदा (१९३६), मालिनी (१८९५)
श्यामा (१९३८)
नाटके.
बिर्सजना(१८९०) बैकुण्ठेर खाता
(१८९७), राजा ओ राणी (१८८९).
काव्य व पुस्तके.
गीतांजली (१९१०) जन्मदिने
(१९४१), नैबेद्य(१९०१),
पत्रपूत(१९३६) परबी (१९२५)
पुनश्च (१९३२) शेष, सप्तक (१९३५) श्यामली(१९३६)
सोनारतारी(१८९३).
अखेरचे पर्व.
देशाच्या स्थितीबद्दल रवींद्रनाथांना काळजी वाटत असे.लो. टिळक, म. गांधी, पं. नेहरू यांच्या बद्दल त्यांच्या मनात प्रेमाची भावना होती. ते करत असलेल्या देशसेवेबद्दल त्यांना आदर वाटत होता. गांधीजींनाही रवींद्रनाथांबद्दल आदर होता. ते त्यांना ‘ गुरुदेव ‘ या नावाने संबोधित. रवींद्रनाथांना लोक आता गुरुदेव म्हणून ओळखू लागले होते. ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांच्या डॉक्टरेट ही पदवी देऊन गौरव केला.
७ ऑगस्ट १९४१ या दिवशी रवींद्रनाथ टागोर(Rabindranath Tagore) यांनी या जगाचा निरोप घेतला.
समारोप.
रवींद्रनाथांनी कलकत्त्यापासून जवळच असणाऱ्या शांतीनिकेतन येथे अरण्यशाळा काढली. श्री निकेतन ही संस्था काढली.
कुटीरोद्योगाची कल्पना, शेतकऱ्यांसाठी कृषी बँक, हितैषी सभा त्यांनी सुरू केल्या. नैसर्गिक सौंदर्याच्या सानिध्यात शिक्षण घ्यावे, यावर रवींद्रनाथांचा भर होता. वृक्षांच्या सावलीत, तपोवनच्या कल्पनेवर आधारित त्यांनी शिक्षणाची नवी पद्धत सुरू केली. तेथील आश्रमात त्यांनी भारतीय चित्रकलेचे पुनरुज्जीवन केले.
त्याचप्रमाणे शेती शिक्षण आणि ग्राम सुधारणा यांचेही शिक्षण तेथे दिले जाई. शांतिनिकेतन विद्यालयातून पुढे विश्वभारती विद्यापीठ उभे राहिले. तेथे जगभरातून आलेले हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असत. टागोरांनी चित्रकला, संगीत, शिक्षण, धर्म इ. क्षेत्रांत नाविन्य निर्माण केले. रवींद्रनाथांचे ‘ जन गण मन ‘ हे राष्ट्रगीत झाले तर अमार सोनार बांगला हे बांगलादेशाचे राष्ट्रगीत झाले. रवींद्रनाथ टागोर (Rabindranath Tagore) हे सौंदर्यवादी कवी व तत्वज्ञ होते.
Best Motivational Marathi Suvichar | जीवन बदलणारे 80+ प्रेरणादायी सुविचार
1 thought on “Rabindranath Tagore (रवींद्रनाथ टागोर)”